बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
तब्बल 350 कोटी रुपयांच्या ठेवींचा घोटाळा झाल्यानं नगर अर्बन बँकेचे ठेवीदार आणि सभासद हवालदिल झाले आहेत. या बँकेच्या ठेवीदारांसह सभासदांना एक प्रकारचा दिलासा देणारी बातमी नुकतीच या आर्थिक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना मिळाली. दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी त्यांच्या बंगल्यात या आर्थिक घोटाळ्यातले चार मुख्य आरोपी लपले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यात दोन महिलांचादेखील समावेश होता. मात्र काही तरी हालचाल झाली आणि दिवंगत माजी खासदार दिलीप गांधींच्या बंगल्यावर आरोपींना पकडायला गेलेले पोलीस हात हलवत परत आल्याची जोरदार चर्चा नगर शहर – परिसरात ऐकायला मिळत आहे.
नगर अर्बन बँकेत तब्बल 2 लाख ठेवीदारांनी 350 कोटींच्या ठेवी मोठ्या विश्वासानं ठेवल्या होत्या. मात्र शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही बँक बुडाली आणि आता त्या सर्व ठेवीदेखील बुडतात की काय, अशी शंका ठेवीदारांमधून व्यक्त केली जात आहे. पोलिसांना या आर्थिक घोटाळ्यातले मुख्य आरोपी सापडत नाहीत. जोपर्यंत मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत, तोपर्यंत या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाला अजिबात गती येणार नाही, हे जळजळीत वास्तव आहे.
नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याच्या या तपासात पोलिसांचे भरपूर प्रयत्न सुरु आहेत. मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र आतापर्यंत तरी पोलिसांच्या पदरी निराशाच आलेली आहे. नाही म्हणायला काही जणांना पोलिसांनी अटक केली असली तरी ते एक तर नामधारी किंवा ‘सह्याजीराव’ आहेत.
दरम्यान, ज्यांच्या नावाभोवती या बँकेचा हा आर्थिक घोटाळा फिरतो आहे, त्या दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी, त्यांच्या सुविद्य पत्नी, दिवंगत माजी खासदार गांधी यांचे बंधू आणि अन्य मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. या घोटाळ्यातले मुख्य चार आरोपी दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यात लपले असताना अवघ्या एका तासातच त्यांना कोणी फरार केलं? या सर्वांना वाचविण्याचा किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा कोण प्रयत्न करतंय? ही आर्थिक घोटाळ्याच्या तपासात नक्की कोणाचा होतोय राजकीय हस्तक्षेप, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नगरकरांना अद्यापतरी मिळालेली नाहीत. भविष्यातही ती कधी मिळतील का, हादेखील मोठा प्रश्नच आहे.
2 लाख ठेवीदार करणार भाजपचं राजकीय वाट्टोळं…!
नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासात पोलिसांवर प्रचंड राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप एका वकिलानं खासगीत बोलताना केला आहे. हे वकील या घोटाळ्याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. यासाठी नगरच्या एसपी ऑफिसमध्ये ते सातत्यानं चकरा मारत असतात. या आर्थिक घोटाळ्यातले मुख्य आरोपी आज (दि. 22) पोलिसांच्या हाती लागणार, अशी त्यांनादेखील आशा होती. मात्र नक्की काय गडबड झाली, नक्की कुठून आणि कोणाचा फोन आला, हे त्यांच्यादेखील लक्षात आलं नाही. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते या आरोपींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची शंका त्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली. मागे असाच राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे नगरला भाजपचा खासदार निवडून आला नाही, असा आरोप करत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत नगर अर्बन बँकेचे 2 लाख ठेवीदार भाजपचं नक्की राजकीय वाट्टोळं केल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा तळतळाट ‘या’ वकील महोदयांनी यावेळी खासगीत बोलताना व्यक्त केलाय.