बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
नेवासे तालुक्याचे भाग्यविधाते माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि त्यांनी केलेल्या सुसंस्कृत, राजकारणाचा काही अपवाद वगळता फारसा कोणाला त्रास झालेला नाही. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून ज्येष्ठ नेते, माजी खासदार आदरणीय गडाख साहेबांची दुसरी आणि तिसरी पिढी ‘मोठ्या साहेबां’च्या आदर्शांवर वाटचाल करत आहे. मात्र या दुसऱ्या पिढीतल्या माजी मंत्री, विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्याच पाठबळावर ‘मोठे’ करण्यात आलेले आता गडाखांच्याच स्वजनांवर ‘उडायला’ लागले आहेत. खरं तर शंकरराव गडाख यांनी या मंडळींची एकदा ‘नसबंदी’ करायलाच हवीय. पण खरंच असं होईल का, हाच मोठा प्रश्न आहे.
वास्तविक पाहता गडाखांंच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता मोठे झालेल्या ‘या’ मंडळींबद्दल सामान्य जनतेत प्रचंड असंतोष धुमसत आहे. तप्त लाव्हारसाप्रमाणं तो असंतोष कधीही उफाळून येऊ शकतो. मात्र केवळ गडाखांच्या मर्जीखातर सध्या तरी यावर कोणी उघड बोलायला तयार होत नाही. पण भविष्यात यावर बोलणारे अनेकजण तयार होत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ज्वालामुखी रौद्र रुप धारण करण्याची चिन्हे आहेत.
सोनईतल्या तिरुपती कॉम्प्लेक्सचं बांधकाम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. याप्रकरणी उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला गेलाय. यामध्ये ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे, ते सारे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोठारी यांच्या संपर्कात आहेत. आतापर्यंत या सर्वांना ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची’, ही विवंचना सतावत होती.
या सर्वांच्या सुदैवानं आणि गडाखांनी मोठे केलेल्यांच्या दुर्दैवानं ‘मांजरांच्या गळ्यात घंटा’ बांधणारा आता सापडलाय. त्यामुळे भविष्यात हा ज्वालामुखी 🌋 कधीही तांडव करु शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार शंकरराव गडाखांकडून एकच अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते, या मंडळींची वेळच्या वेळी ‘नसबंदी’ व्हायलाच हवी.
विरोधकांचा सन्मान करण्याची तर गडाख घराण्याची परंपरा…!
आंब्याच्या, चिंचेच्या किंवा अन्य फळांच्या झाडांना कोणीही दगडं मारत असतं. फळांच्या वजनानं झुकलेलं ते डेरेदार झाड कधीच तक्रार करत नाही. त्याच धर्तीवर माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी त्यांच्या परिवाराला एक आदर्श घालून दिलाय. गडाख यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. अजूनही आरोपांचा तो ‘सिलसिला’ सुरुच आहे. मात्र विरोधकांना शब्दानंही उत्तर देण्याची पध्दत गडाख आणि त्यांच्या परिवारातल्या कोणत्याही सदस्यानं अवलंबविलेली नाही. कारण एकच, विरोधकांचा सन्मान करण्याची खरं तर गडाख घराण्याची परंपरा आहे.