बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
‘मी तर साधा माणूस. मी तर फकीर. माझ्याकडे काहीच नाही. मी लोकांसाठी काम करतो, लोकांमध्ये राहतो. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.’ अशी स्वतःबद्दल ओळख करुन देणारे, कोरोना महामारीच्या काळात अक्षरशः कोरोनाग्रस्त रुग्णांसमवेत रमणारे, आमदार झाल्यानंतर मंत्रालयातदेखील जमिनीवरच झोपणारे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातले अवैध धंदे आणि त्यातून होणारे ‘कलेक्शन’ त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एसपी ऑफिससमोर भव्य दिव्य आंदोलन केलं होतं. मात्र खासदार लंकेंचं आंदोलनच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यामुळे खासदार लंके यांना या बातमीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करावसं वाटतं, की तुमच्या ‘त्या’ आंदोलनावर संशय व्यक्त केला जातोय. आता तरी व्यक्त व्हा.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये ठळक मथळ्यात आणि आकर्षक अशा ‘फॉन्ट’मध्ये खासदार लंके यांच्या त्या आंदोलनावर संशय व्यक्त करणाऱ्या बातम्या प्रकाशित झाल्या. मात्र तरीही खासदार लंके यांच्याकडून याविषयी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही. नक्की ते स्पष्टीकरण येणार का आणि कधी येणार, याची खरं तर नगरकरांना कमालीची उत्कंठा लागली आहे.
नगर जिल्ह्यात पोलिसांमार्फत अवैध वाळू धंद्यासह अनेक प्रकारच्या बेकायदेशीर धंद्याच्या माध्यमातून होणाऱ्या ‘कलेक्शन’ची सविस्तर यादी खासदार लंके यांनी त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान जाहीर केली होती. काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावंदेखील त्यांनी घेतली होती. त्यानंतर एस. पी. राकेश ओला यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखीलकेल्या. अर्थात आद्यपही काही हजर झालेले नाहीत किंवा वरिष्ठांनी त्यांना सोडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नगर जिल्ह्यातले अवैध धंदे खरंच बंद झालेत का आणि नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे यांनी खासदार लंके यांना दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सर्व काही कार्यवाही झाली का, त्यातून खासदार लंके यांचं खरोखरच समाधान झालं का, त्यांचं समाधान नसेल झालं तर ते पुन्हा आंदोलन करणार का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आता व्यक्त केल्या जात आहे.
… तर कसे होतील एकट्या नगरचेच अवैध धंदे बंद?
राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मटका, बिंगो, अवैध वाळू तस्करी, बेकायदा दारु विक्री, वेश्याव्यवसाय, गोहत्या, गोमांस विक्री असे सारे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. हे धंदे बंद करायचेच असतील तर राज्याचे जे प्रमुख आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस खात्याचे राज्यातले सर्वच वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी हे अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र सगळीकडे हे धंदे सुरु असताना एकट्या नगरमध्येच ते कसे बंद होतील, याचा सारासार विचार खरं तर सर्वांनीच विशेषतः नगरच्या ‘बोरुबहाद्दरां’नी करायला हवाय.
खासदार लंके साहेब, आता बोलाच…!
राजकीय व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप होत असतात. अशा व्यक्ती सार्वजनिक जीवनात वावरत असल्यानं हे स्वाभाविकच आहे. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेसुद्धा याला अपवाद नाहीत. मात्र या आरोप प्रत्यारोपांचे खंडन वेळच्या वेळी झालं नाही तर ज्यांच्यावर आरोप केला जातो, त्या व्यक्तीच्या कार्यपद्धतीबद्दल संशय आणखी वाढत जातो. हे अलिखित सूत्र ध्यानात घेऊन खासदार लंके यांनी त्यांची भूमिका आता स्पष्ट करायलाच हवी. अन्यथा ‘याजसाठीच केला का अट्टाहास, नगरमध्ये अवैध धंद्यांचा पुन्हा एकदा बोलबाला व्हावा’, अशा प्रकारच्या आधुनिक अभंगाची कोणाला तरी नव्यानं रचना करावी लागेल.