अहिल्यानगरनगर महापालिकेचं स्वच्छता सर्वेक्षण ठरतंय 'एक जादूई चादर' ; केंद्र आणि राज्य...

नगर महापालिकेचं स्वच्छता सर्वेक्षण ठरतंय ‘एक जादूई चादर’ ; केंद्र आणि राज्य सरकारची ‘टीम’ चादर फेकून देणार का?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील /

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर / अहमदनगर

कामाचा प्रचंड कंटाळा असलेला एखादा मुलगा त्याच्या वडिलांच्या धाकामुळे काम करण्याचा केवळ आव आणतो. घरात वडील नसल्यावर तो निवांत बसतो. मात्र वडील येताच असं काही काम करतो, की घरातलं सगळं काम तोच एकटा करतो, असा भास त्याच्या वडिलांना व्हावा. अशाच पद्धतीचं कामकाज अहिल्यानगर (अहमदनगर) महापालिका प्रशासनाचं सध्या सुरु आहे. नगर शहर आणि उपनगरात प्रचंड कचरा, त्या कचऱ्याची दुर्गंधी, नाल्यांची भग्नावस्था, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर घुटमळणारी मोकाट जनावरं, ओढे – नाले गायब झाल्यानं दरवर्षी नागरिकांच्या घरात शिरणारं पावसाचं पाणी, हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच पण शेवटची घटका मोजत असलेली शौचालयं या अशा विचित्र परिस्थितीत महापालिका प्रशासनानं स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा काल (दि. १८) डांगोरा पिटवला.

केंद्र आणि राज्य शासनाची ‘टीम’ या अभियानाची पाहणी करण्यासाठी ज्यावेळी नगर महापालिका हद्दीत येते, त्यावेळी अतिशय खराब असलेली शौचालयं चकचकीत केली जातात. ती पाहून असं वाटतं, की ही शौचालयं महापालिकेनं नुकतीच बांधली आहेत. अशा प्रकारची ‘जादुई चादर’ टाकून केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘टीम’ची दिशाभूल केली जाते. केंद्र आणि राज्य शासनाची ही ‘टीम’ ही ‘जादुई चादर’ काढून फेकून देणार का हाच खरा प्रश्न आहे. कदाचित असं झालं तर महापालिका प्रशासनाचं पितळ उघड पडल्याशिवाय राहणार नाही.

नागरिकांच्या सहभागानं नगर महापालिकेचं हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या अभियानाकडे नगरकरांनी शंभर टक्के पाठ फिरवली आहे. याचं कारण नगरकरांना आता या ‘चमकोगिरी’चा प्रचंड कंटाळा आलेला आहे.

नगर महापालिकेच्या आरोग्य विभागानं जर डेंग्यू आणि मलेरिया आजाराच्या रुग्णांची खरी खरी आकडेवारी जाहीर केली तर महापालिकेची ही ‘चमकोगिरी’ चव्हाट्यावर यायला वेळ लागणार नाही.

आयुक्त डांगे आणि आयुक्त शिंदे यांना खुलं आव्हान…!

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डांगे आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे आयुक्त शिंदे यांना आमचं खुलं आव्हान आहे, कोठला परिसरातल्या डीपी जवळच्या नाल्यात जी दुर्गंधी साचली आहे, त्या ठिकाणी फक्त नाकाला हात न लावता तिथं फक्त पाच मिनिटं उभं राहून दाखवा. सामान्य नगरकर दुर्गंधीत कशा पद्धतीने राहताहेत, याची तुम्हाला नक्की जाणीव होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या