अहिल्यानगरनेवाशाचं 'वाट्टोळं' आहे 'या' लोकांच्याच हाती ; एकास एक लढतीतूनच तालुक्यात येणार...

नेवाशाचं ‘वाट्टोळं’ आहे ‘या’ लोकांच्याच हाती ; एकास एक लढतीतूनच तालुक्यात येणार रंगत…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्यूज नेटवर्क / अहमदनगर

विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण हळूहळू तयार होऊ लागलंय. येत्या १३ आक्टोबरनंतर या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास या तालुक्यात इच्छुकांची डझनभर किंबहूना त्यापेक्षा जास्त संख्या आजमितीला दिसत आहे. खरं तर यापैकी कोणी तरी एकच आमदार होणार आहे. मात्र या सर्वच इच्छुकांनी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला यावेळी जर आवर घातला नाही, तर या तालुक्याचं ‘वाट्टोळं’ किंवा पिछेहाट ही नक्कीच होणार आणि यासाठी हेच इच्छूक जबाबदार ठरणार असून नेवाशाचं ‘वाट्टोळं’ फक्त आणि फक्त या लोकांच्याच हातात असणार आहे. दुसरीकडे या तालुक्यात एकास एक लढत झाली तर मात्र चांगलीच राजकीय रंगत पहायला मिळू शकते.

अध्यात्मिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या या स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात भविष्यात खूप काही चांगलं करायला भावी आमदारांना प्रचंड अशी मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी त्या भावी आमदाराकडे इच्छाशक्ती, विकासाचा दृष्टिकोन, सर्वच घटकांना समान पध्दतीनं न्याय देण्याची मानसिकता, युवा मतदारांसाठी काही तरी भरीव स्वरुपाचं काम करण्याची भावना या आणि अशा सर्वच निकषांची आवश्यकता आहे.

‘सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता’ या स्वार्थी धोरणामुळे या मतदारसंघात आजपर्यंत नजरेत भरतील, अशी चार दोन वगळता कोणतीही कामं आजपर्यंत दुर्दैवानं झालेली नाहीत. परिणामी आयटी क्षेत्रात प्रचंड बुद्धिमत्ता असलेला नेवाशाचा तरुण रोजगारासाठी दुसरीकडं जातो आहे. तरुणाईची ही शक्ती याच तालुक्यात कामी यावी, यासाठी भावी आमदाराकडून नेवासकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

इच्छुकांनो! जरा थांबा, पण भविष्यात ‘इथं’ही लढा…!

विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक डझनहून संभाव्य उमेदवार आजमितीला निवडणूक रिंगणात स्पष्ट आणि अस्पष्टपणे दिसत आहे. त्यांची नावं आम्ही यापूर्वीच प्रसारित केली आहेत. मात्र या सर्वच इच्छुकांपैकी ज्यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरीट’ आहे, असेच फक्त दोघे वगळून इतरांना आम्ही असं सुचवू इच्छितो, की तुम्ही आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीत थांबाच. कारण तुम्ही थांबला नाहीत तर मतांचं विभाजन होऊन भलताच कोणी निवडून येईल. यासाठी इच्छुकांनी यावेळी थांबावं आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कारखाना, देवस्थान याठिकाणी लढावं. ज्यांना यातही काहीच मिळालं नाही, त्यांच्यासाठी सत्तेत येणारं नवं सरकार महामंडळं देईलच, अशी खात्री इच्छुकांनी बाळगायला हरकत नाही. असो, संत ज्ञानेश्वरांचा पावन पदस्पर्श लाभलेल्या या नेवाशाच्या भल्यासाठी या तालुक्यातला एक भूमिपुत्र आणि जबाबदार मतदार या नात्यानं आमचा हा लेखनप्रपंच आहे. धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या