मागील झालेल्या निवडणुकांमध्ये शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ निवड, मुळा साखर कारखाना निवडणूक, मार्केट कमिटी निवडणूक अशा अनेक निवडणुकांमध्ये आजी माजी लोकप्रतिनिधींनी जी हातमिळवणी केली, तडजोडी केल्या, जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली, पैशांसाठी कार्यकर्त्यांची फसवणूक केली, निष्ठावान कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, या सर्व प्रश्नांची जनतेसमोर पोलखोल करणार, असं जाहीर वक्तव्य प्रसिद्ध लिलियम पार्क हॉटेल उद्योग समूहाचे संस्थापक, संचालक आणि लोकशक्ती आघाडीचे प्रमुख समन्वयक सुरेश (अण्णा) शेटे पाटील यांनी केलं. शेटे पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य नेवासे तालुक्याचे विद्यमान आमदार, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासाठी मोठा सूचक इशारा असल्याचं समजलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी नेवासे तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या लोकशक्ती आघाडीकडून लोकन्याय यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची जोरदार तयारी आघाडीकडून करण्यात येत असून यासाठी तालुका पिंजून काढला जात आहे. तर गावोगावी भेटीगाठींनी जोर धरला आहे.
यात आज नेवासे तालुक्यातल्या भानसहिवरे याठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान लोकशक्ती आघाडीचे समन्वयक सुरेश शेटे यांनी लोकन्याय यात्रेदरम्यान केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीयदृष्ट्या जागरूक असलेल्या नेवासे तालुक्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेटे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, संभाजी माळवदे यांनी सांगितलं, की लोकन्याय यात्रा ही फक्त राजकीय उद्दिष्ट ठेवून काढण्यात आलेली नसून याद्वारे जनतेचे प्रश्न समजून घेण्याचे सामाजिक कार्य पार पडणार आहे. त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. सादिक शिलेदार म्हणाले, ‘भूतकाळात अशी यात्रा झाली नसेल व पुढेही अशी यात्रा होणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून या यात्रेतून तालुक्यातील राजकारणाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न साध्य होणार आहे.
यावेळी बाळासाहेब निपुंगे यांनी सांगितलं, की लोकशक्ती आघाडी ही खरी शेतकऱ्यांची आघाडी असून या आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडविता येतील. त्यासाठी समस्त शेतकरी बांधवांनी प्रचंड संख्येनं यात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं.
यावेळी लोकशक्ती आघाडीचे संतोष काळे, गणपत मोरे, विकास चव्हाण, संदीप अलवने यांच्यासह गणेश ढोकणे, उमेश ताकटे, देवा काळे आणि हिवरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.