अहिल्यानगर'भाग्य' फुटलं ! 'लक्ष्मी' पळाली...! सोनईसह जिल्हाभरात...

‘भाग्य’ फुटलं ! ‘लक्ष्मी’ पळाली…! सोनईसह जिल्हाभरात शाखा असलेल्या ‘या’ मल्टिस्टेटच्या आर्थिक ‘गडबडी’ आल्या चव्हाट्यावर…!

Published on

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनई शहरात असलेल्या सोनई – राहुरी रस्त्यालगतच्या घावटे हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटलच्या मध्यभागी दुसऱ्या मजल्यावरच्या भाडोत्री गाळ्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरु असलेल्या भाग्य लक्ष्मी मल्टिस्टेट या वित्तीय संस्थेच्या आर्थिक गडबडी चव्हाट्यावर आल्या आहेत. सोनईसह संपूर्ण तालुक्यात या वित्तीय संस्थेच्या शाखा कार्यरत होत्या. मात्र या वित्तीय संस्थेचे चेअरमन भारत बबन पुंड (रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्यात आणि ठेवीदारांमध्ये दोन तीन दिवसांपासून चांगलीच धुमश्चक्री सुरु होती. त्यातून भाग्य लक्ष्मी मल्टिस्टेट या वित्तीय संस्थेच्या आर्थिक गडबडी चर्चेत आल्या आणि या संस्थेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांचं ‘भाग्य’ (नशीब) फुटलं आणि त्यांची ‘लक्ष्मी’ पळाली.

या संस्थेचं ज्यांना संचालक आलं, त्या भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड यांनी नगरच्या एसपी कार्यालयात काल (दि. २६) एक निवेदन दिले. या निवेदनात गायकवाड यांनी म्हटलं आहे, की भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत बबन पुंड यांनी गायकवाड यांच्याकडून केवायसीची कागदपत्रं घेतली आणि त्या कागदपत्रांचा गैरवापर केला. पुंड यांनी स्वार्थासाठी गायकवाड यांना संचालक केलं असून त्याची पूर्वकल्पनादेखील देण्यात आली नाही, असं गायकवाड यांचं म्हणणं आहे.

या मल्टीस्टेट वित्तीय संस्थेमध्ये एका ठेवीदारानं सात कोटी रुपये ठेवले. त्या मोबदल्यात त्या ठेवीदाराला तब्बल २५ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याची आश्चर्यजनक घटना घडल्याचंदेखील यानिमित्तानं बोललं जात आहे.

दरम्यान, नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव इथं राहत असलेल्या जालिंदर देवराम विधाटे, सचिन दत्तात्रय विधाटे, चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाटे आदींसह बबन महादू पुंड (रा. बेलपिंपळगाव तालुका नेवासा) यांनी अशा तक्रारी केल्या आहेत, की भारत पुंड यांनी आमचे आधारकार्ड आणि सह्या घेऊन आमची या वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली. या संस्थेकडे 26 कोटी रुपयांच्या ठेवी असून अवघे नऊ कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. उर्वरित रकमेचा हिशोब लागत नसल्यानं भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे.

ठेवीदारांना आता ‘सासरेबुवां’चाच आधार…!

भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचं नगरमध्ये असलेल्या पाईपलाईन रोड परिसरातल्या टोलेजंग इमारतीत भव्य दिव्य कार्यालय आहे. या कार्यालयासमोर काल दि. २६) दुपारी शेकडो ठेवीदार जमा झाले होते. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी चेअरमन पुंड यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. या ठेवीदारांतले अनेक जण पुंड यांच्या घरीदेखील गेले. काही ठेवीदारांना पुंड यांचे सासरे नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव इथं राहत असल्याचं समजलं. पुंड यांच्या सासरेबुवांचा मोबाईल नंबर मिळवत ठेवीदारांनी त्यांच्याशी संपर्क साधत तक्रारी केल्या. त्यावर नेवासे तालुक्यातल्या पाचेगावचे पुंड यांचे सासरेबुवा असलेल्या विधाटे (पूर्ण नाव माहित नाही) यांनी या ठेवीदारांना दोन दिवस थांबायची विनंती केली. मी काही तरी करतो, असं सांगितलं त्यामुळे आता या ठेवीदारांना पुंड यांच्या सासरेबुवांचाच एकमेव आधार उरला असून हे ठेवीदार परवा अर्थात (दि. २९) रोजी पुंड यांचे सासरे राहत असलेल्या नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव इंथं शेकडोंच्या संख्येनं जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या