बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर
57 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलेल्या भाग्य लक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत पुंड यांनी या मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेकांना आर्थिकदृष्ट्या गंडवलं. त्याचबरोबर अनेक बँकांनादेखील पुंड यांनी गंडा घातला असल्याचं समोर आलं आहे. अर्थात पुंड यांच्याविरुद्ध पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल केल्यानंतर या सर्व बाबी उजेडात येणार आहेतच. त्यामुळेच भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत पुंड यांच्याविरुद्ध पोलीस कधी गुन्हा दाखल करणार, याची अनेकांना उत्कंठा लागली आहे.
नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या एका सहकारी बँकेच्या शाखेतून भारत पुंड यांनी तब्बल ५० लाख रुपये कर्ज घेतल्याची चर्चा आहे. एका सरकारी बँकेतून पुंड यांनी ३२ लाख आणि खासगी बँकेतून ३ कोटी कर्ज घेतलं असल्याचे देखील बोललं जात आहे.
विशेष म्हणजे पुंड यांनी ही सर्व कर्जे व्यक्तिगत नावानं घेतली असून या कर्ज प्रकरणासाठी संस्थेच्या पैशांतून आलेल्या जमीनी तारण म्हणून ठेवल्या असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर पुंड यांनी कर्मचाऱ्यांच्या नावानंदेखील कर्ज घेतलं असून त्यांनी कर्मचाऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या गंडवलं आहे.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या संस्थेच्या सर्व शाखांचे मिळून ४० ते ५० कर्मचारी नोकरीला होते. परंतु या संस्थेत कुठल्याही कामगार कायद्याचं पालन करण्यात आलेलं नाही, अशीदेखील माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांचा त्यांना मिळणाऱ्या पगारातून कुठल्याही प्रकारचा ईपीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड कपात करण्यात आलेला नव्हता.
या कर्मचाऱ्यांना पुंड यांनी डिपॉझिट आणण्याचं उद्दिष्ट दिलं होतं. हे उद्दिष्ट पूर्ण केलं तरच कर्मचाऱ्यांना पगार दिला जात होता. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त पाच ते सहा हजार पगार दिला जात होता.
पुंड यांनी या कर्मचाऱ्यांना एक लाख डिपॉझिटवर पाच ते दहा टक्के कमिशन देण्याचं कबूल केलं होतं. जास्तीत जास्त कमिशन मिळविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट आणून भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या संस्थेमध्ये जमा केलं. आता या कर्मचाऱ्यांवर नातेवाईकांपासून स्वतः तोंड लपविण्याची वेळ आली आहे.
भारत पुंड यांनी स्वतःच्या मित्रालादेखील सोडलं नाही. शेवगाव तालुक्यातल्या भातकुडगावचा पुंड यांचा एक मित्र आहे. त्याने तब्बल ७ कोटी रुपये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये गुंतविले असल्याचं वास्तव आहे. दरम्यान, पुंड यांनी विविध बँकांकडून जी कर्जे घेतली आहेत, त्यावर संबंधित बँकेच्या मॅनेजरला घसघशीत कमिशन दिलं असून या प्रकाराचीदेखील सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
पुंड यांनी विविध प्रकारच्या बँकांकडून जी कर्जे घेतली आहेत, त्या कर्जासाठी जो रिपोर्ट तयार करावा लागतो, तो रिपोर्ट तयार करणारे सीएसुध्दा या ‘भानगडी’मध्ये सामील असल्याची दाट शक्यता आहे. या सीए मंडळींनी ५ ते १० टक्के कमिशन घेऊन बोगस रिपोर्ट तयार केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे मल्टीस्टेटचा लेखा जोखा तयार करणाऱ्या सीएंची चौकशी करण्याची गरज आहे. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत पुंड यांनी विविध बँकांमधून जी कर्जे घेतली आहेत, त्यासाठी अनेकजण पुंड यांना जामीनदार झालेले असून ते सध्या फार आहेत. या जामीनदारांचे धनादेश कर्जासाठी विविध बँकांनी ठेऊन घेतलेले आहेत. भविष्यात त्यांच्याविरुद्ध भादंवि 138 या कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि समाजातलं तथाकथित ‘कॉर्पोरेट लाईफ’ अबाधित ठेवण्यासाठी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत बबन पुंड यांनी नको ते उद्योग केलेले आहेत. स्वतः मालक असल्याच्या अविर्भावात अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी बारा – बारा तास काम करायला भाग पाडलेलं आहे. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांनादेखील आर्थिकदृष्ट्या फसवलं आहे. मल्टीस्टेटच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा घालणाऱ्या या माणसाचं नक्की काय करायचं, असा प्रश्न करोडो रुपयांच्या ठेवी जमा करणाऱ्या ठेवीदारांच्या समोर उभा ठाकला आहे. तूर्तास इतकंच, धन्यवाद.