नगरमध्ये वाहन चालवणं हे इतकं धोक्याचं झालं आहे, की एक वेळ सर्कसमध्ये असलेला तो ‘मौत का कुआं’ परवडला, असं म्हणायची वेळ आता नगरकरांवर आली आहे.
जो नगरमध्ये यशस्वीपणे वाहन चालवतो, तो कुठल्याही शहरात अडचणीत येत नाही, असं गमतीनं म्हटलं जातं. मात्र हीच गंमत आता नगरकरांच्याच जीवावर बेतायला लागली आहे.
नगरमध्ये जो रिक्षा चालक वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांना हप्ता देईल, त्याला सगळे नियम आणि कायदे माफ आहेत. त्या रिक्षा चालकांनी फ्रंट सीटवर दहा प्रवासी नेले तरी कोणीच काही म्हणत नाही, असं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज साळवे यांनी यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
नगर शहर आणि परिसरातली वाहतूक हा गेल्या अनेक दिवसांचा मोठा कठीण प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडे जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, खरं तर त्यांचीच यासाठी मानसिकता नाही, असे दिसत आहे. नगर शहरातल्या अनेक भागांत वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालेला असताना हा विषय शहर वाहतूक नियंत्रण शाखा गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे नगरकरांसाठी हा मोठा संतापाचा विषय झाला आहे.
नगर ट्रॅफिकचे पीएसआय परदेशी साहेब, गोरगरिबांच्या पोटावर का मारताय?
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांच्याबद्दलसुद्धा अनेक तक्रारी आहेत. पीएसआय परदेशी हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारं वाहन ट्रॅफिक कार्यालय परिसरात सकाळी आणून लावतात. ते वाहन संध्याकाळपर्यंत तिथंच असतं. वाहन चालकाला त्याठिकाणी दिवसभर ताटकळत थांबावं लागतं. विशेष म्हणजे या वाहनाची चावी ठाणे अंमलदाराकडे दिली जाते. ‘चिरीमिरी’ दिल्यानंतर सदरचे वाहन सोडून दिलं जातं आणि त्या वाहन चालकाला ‘मंथली’चं कंत्राट दिलं जातं. ड्युटी अंमलदार शेख आणि हेड कॉन्स्टेबल खामकर हे दोघे पीएसआय परदेशी यांच्याबरोबर फिरुन हप्ता नं देणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सतत पुढाकार घेत असतात. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारावासा असं वाटतो, की नगर ट्रॅफिकचे पीएसआय परदेशी साहेब, गोरगरिबांच्या पोटावर का मारताय?