बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतन टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारलं, ‘सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का’? रतन टाटा म्हणाले, ‘मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला’.
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथंही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता. जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हिलचेअर विकत घेण्यास सांगितलं. सुमारे 200 मुलं होती. मित्राच्या सांगण्यावरुन मी लगेच व्हील चेअर घेतली.
पण मित्रानं आग्रह धरला, की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी. मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हातानं व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो.
जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणू काही कसला तरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो, तेव्हा त्या मुलांपैकी एकानं माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारलं, ‘तुला आणखी काही हवं आहे का’? मग मुलानं मला जे उत्तर दिलं, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
मुलाने म्हटलं, ‘मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे. जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”
वरील विस्मयकारक कथेचा सार हा आहे, की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का? कोणी तरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते. रोखठोक 24 न्युज नेटवर्क परिवार आणि आमच्या लाखो वाचकांच्यावतीनं रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!